मालुंजकर चौफुली व मालदाड रोड परिसरात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी; परिसरात भीतीचे वातावरण!
संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस नागरिकांविषयी अत्यंत घातक ठरत आहे. आज रात्री ८:०० ते ८:३० वाजण्याच्या सुमारास घुलेवाडी येथील एकाच ठिकाणी बिबट्याने दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही व्यक्तींच्या पायाला बिबट्याने गंभीर चावा घेतला असून, सुदैवाने दोघेही या भीषण संकटातून थोडक्यात बचावले आहेत. जखमींवर सध्या संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घुलेवाडी (संगमनेर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले सुशांत संपत जोंधळे
मिळालेल्या माहितीनुसार, घुलेवाडी परिसरातील मालुंजकर चौफुली, मालुंजकर मळा आणि मालदाड रोड जोडणाऱ्या परिसरात ही घटना घडली. कोकणगाव येथील रहिवासी सुशांत संपत जोंधळे आणि घुलेवाडी येथील रहिवासी भाऊसाहेब काशिनाथ पानसरे हे दोघेही या परिसरात असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने दोघांच्याही पायावर हल्ला करत गंभीर चावा घेतला. बिबट्याचा इरादा भयानक होता, मात्र दोघांनीही दाखवलेले प्रसंगावधान आणि नशिबाची साथ यामुळे ते थोडक्यात वाचले

घुलेवाडी (संगमनेर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले भाऊसाहेब काशिनाथ पानसरे,
घटनेची माहिती मिळताच ‘निर्भीड वर्तमान’चे सहसंपादक शशिकांत दारोळे यांनी तातडीने संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी स्वतः जखमी सुशांत जोंधळे व भाऊसाहेब पानसरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली आणि दोन्ही जखमींना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. सध्या दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.परिसरात तीव्र संताप; तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
एकाच जागी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात बिबट्याने दोघांना लक्ष्य केल्यामुळे घुलेवाडी आणि परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. हा बिबट्या मानवी वस्तीच्या अत्यंत जवळ आल्याचे यावरून स्पष्ट होते. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा आणि या हिंस्र बिबट्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आवाहन:
रात्रीच्या वेळी या परिसरातून प्रवास करताना नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे. सोबत काठी, टॉर्च ठेवावी आणि शक्यतो समूहाने प्रवास करावा. काही संशयास्पद आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे.


