ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

MJP : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, निर्भीड वर्तमान:- ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत अपूर्ण कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. सुरू असलेल्या कामांची माहिती जिओ टॅगिंग केलेली तसेच भौगोलिक माहिती प्रणालीत भरलेली असावी.

ग्रामपंचायत स्तरावर कामांसाठी जागा हस्तांतरीत करताना अडचण येत असल्यास त्याची यादी संबंधित तहसिलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, जागा हस्तांतरणासाठी मदत करण्यात येईल. भोर, दौंड, इंदापूर व आंबेगाव तालुक्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. 19 ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यावाचून प्रलंबित असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कामे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय ठेवून पूर्ण करावीत, अशा सूचनाही डॉ. दिवसे यांनी दिल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील सूरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली. सर्व स्तरावर समन्वय ठेवून कामे तातडीने पूर्ण करावीत. एकही काम प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कार्यकारी अभियंता श्री. पाथरवट यांनी जल जीवन मिशन- हर घर जल अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत सादरीकरणानद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या १ हजार २३९ योजना सूरू असून त्यापैकी २३५ योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या आहेत तर ३६६ ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची कार्यवाही गतीने करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी अभियंता श्री. नाडगौडा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. पाणी पुरवठ्याच्या १११ योजना सुरू असून त्यापैकी ४ योजना पूर्ण झालेल्या आहेत. ३० योजनांची ७५ ते १०० टक्के झाली असून ५१ योजनांची भौतिक प्रगती ५० ते ७५ टक्के दरम्यान आहे. उर्वरित योजनांची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!