ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य शासनामार्फत रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार साजरा..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- राज्य शासनामार्फत रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा हा स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.

सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दीव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!