ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

देशात वर्षाभरात 5 लाख अपघात होत असून यामध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुण वर्गाचा समावेश- मंत्री नितीन गडकरी

अपघातामुळे देशातील जीडीपीचे 3 टक्के नुकसान होत असून यातून होणारे आर्थिक सामाजिक नुकसान अत्यंत गंभीर आहे

नागपुर दि. 8 निर्भीड वर्तमान:- शालेय जीवनातच विद्यार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम शिकवणे हे गरजेचे असून 18 वर्षाखालील मुलांना रस्ता सुरक्षतेसाठी जागरूक करण्यासाठी समाज माध्यमे, महाविद्यालय, सामाजिक संघटना यांनी पुढाकर घ्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे ‘सडक सुरक्षा अभियान 2024 – संवेदना का सफर ‘ या वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलेल्या मुलाखती मधे केले आहे.

देशात वर्षाभरात 5 लाख अपघात होत असून यामध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुण वर्गाचा समावेश

या अपघातामुळे देशातील जीडीपीचे 3 टक्के नुकसान होत असून यातून होणारे आर्थिक सामाजिक नुकसान अत्यंत गंभीर आहे. देशातील रस्ते वाहतुकीचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

रस्ते वाहतूक सुरक्षता लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानांकन पाळून देशात नवीन बस कोड तयार झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून यापुढे प्रत्येक वाहनांमध्ये 6 एअर बॅग्स अनिवार्य केलेले असून ट्रक ड्रायव्हर यांना सुद्धा एसी केबिन अनिवार्य केलेले आहेत ,असे  गडकरींनी यावेळी नमुद केले.

रोड इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशातील रस्त्यावर 3 ,600 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण स्थळ) आढळले असून त्यांची योग्य ती काळजी घेऊन ती स्थळे वाहतूक योग्य बनवण्यात आली आहेत. नवीन मोटर अधिनियम कायद्यातील सर्व तरतुदीचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच इथून पुढे वाहतूक परवाना प्रदान करताना वाहतूक संबंधीची ऑनलाइन परीक्षा देणे गरजेचे आहे. वाहतुकीचे सर्व नियम कायदे या परीक्षेत अंतर्भूत होतील याबद्दल तयारी सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील रस्त्यांसाठी व्हाईट टॉपिंग काँक्रिटीकरण करून रस्त्याची मजबुती अजून वाढवण्यात येणार आहे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि दळणवळणाला चालना मिळेल यासाठी 6 हजार कोटींचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन पोलीस विभाग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या समन्वयातून वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच याबद्दलची नवीन मार्गदर्शिका लवकरच उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक परवाना उपलब्ध होण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारणे गरजेचे असून याचाच एक भाग म्हणून डिजिटल सिस्टम उभारल्या गेलेली आहे या सिस्टीमच्या माध्यमातून वाहतुकीसंबंधीची सर्व नियम माहिती जनतेला उपलब्ध होईल.

नागपूर महानगरपालिका हद्दीतील आणि नागपूर जवळील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसाठी अपघात निवारण समिती स्थापन केलेल्या असून अपघात प्रवण क्षेत्र ओळखून त्यांचे व्यवस्थापन योग्य रितीने करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते वाहतूक सुरक्षतचे नियम शालेय स्तरावर एनएसएस, एनसीसी यांच्यामार्फत तसेच सोशल मीडिया द्वारे सामान्य जनतेला सांगण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य जनतेने प्रत्येकाने वाहतुकीचे नियम तोडणार नाही अशी हमी घेऊनच आपले आणि समाजाचे स्वास्थ्य जपावे असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमामध्ये केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!