यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून करत आहे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती

वर्तमान टाईम्स, वृत्तसेवा :-  यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील त्यांना प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

बेटी बचाव बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या 75 महिला जवान 15 राज्यामधून आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 121 जिल्ह्यातून अंदाजे 10 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 3 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगर, शिलाँग, कन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे.

या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादव, कु. युक्ता कांबळे (चेंबूर), कु.कस्तुरी देसाई (प्रभादेवी), कु. इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि कु. ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

Exit mobile version