केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या दीक्षांत सोहळ्यात डी.लिट. पदवी प्रदान..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल व कुलपती रमेश बैस, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या सर्वांगीण विकासात विशेषतः शैक्षणिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील श्री गडकरीजी यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
संत महात्म्यांची आणि संघर्षाची शिकवण देणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीला वंदन करत गडकरी यांनी देशाच्या आध्यात्मिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासातील सोनेरी पान या शब्दात नांदेड शहराचे महत्त्व सांगितले. मुक्ती संग्रामाच्या चळवळीचे अर्ध्वयू, सन्यासी असूनही लढाऊ बाण्याचे स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या वतीने ही मानाची पदवी मिळणे हे आपले भाग्य असल्याच्या भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या.
शैक्षणिक विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया असल्यामुळे विद्यापीठे व शैक्षणिक संस्था या विकासाचा वेग वाढवण्यात व समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठीच्या संशोधनावर व नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. राजकीय इच्छाशक्तीला विद्यापीठांसारख्या संस्थांची सोबत मिळाली, तर समाजाचा कायापालट निश्चित शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.