अप्पर वर्धा प्रकल्पबाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री झाली बैठक

वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती एकत्र करण्याचे निर्देश

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत अप्पर वर्धा प्रकल्पबाधितांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषांगिक मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या प्रकल्पामुळे अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. यातील बांधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन, धरणग्रस्तांसाठी प्रतिक्षा यादी तयार करणे, ज्यांना नोकरी शक्य नाही, त्यांना नुकसान भरपाई अशा विविध पर्यायांबाबत चर्चा झाली. या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती एकत्र करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाने प्रकल्पग्रस्तांशी समन्वय साधून विविध उपाययोजना, तोडग्यांचे पर्याय तयार ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी  दिल्या आहेत.

या बैठकीस प्रकल्प बाधितांचे प्रतिनिधी साहेबराव गिधडे, आनंदराव गावंडे, विनायक कुरवाडे, हरिभाऊ साठवले, दीपक पाटील, प्रवीण सातपुते, विनोद विरुळकर आधी उपस्थित होते.

Exit mobile version